Halloween Costume ideas 2015

आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.

2016
Aai Aai/Baba Aarti Prabhu Aashadi Ekadashi Aathvan Aayushya Adarsh Vyaktimatva Akshay Tritiya Anna Hazare Ashru Baba Baiko Balasaheb Thackeray Balpan Bhaubeej Bhavana Bhet Breakup Chandrashekhar Gokhale Charolya Cricket Dasara Datta Jayanti Dev Dhantrayodashi Din Vishesh Diwali Dr. Ambedkar Jayanti Dukh Durava Ektepana Gadge Maharaj Ganpati Gokulashtami Gudi Padwa Guru Poornima Hanuman Jayanti Holi Itar Kavita Jagatik Mahila Din Jai Satguru Jivan Kamlesh Gunjal Kavi Grace Kojagiri Purnima Kshan Premache Kusumagraj Lagna Lakshmi Pujan Lal Bahadur Shastri Lata Mangeshkar Lokpriya Kavi Maasaheb Jijabai Jayanti Maharashtra Din Mahashivratri Mahatma Jyotiba Phule Maitri Maitri Divas Maitrin Makar Sankranti Mangesh Padgaonkar Mann Marathi Bhasha Din Marathi Kavita Marathi Lekh Marathi Prem Kavita Mithi Mitra Mumbai Terrorist Attacks Najar Nanashaheb Dharmadhikari Narali Purnima Nate Nav Varsh Navratri Odh Pahila Paus Pahila Prem Pahili Bhet Pandharpur Wari Paus Kavita Prajasattak Din Prem Prem Divas Prem Mhanje Nakki Kai Aste Prem Patra Premat Priyasi Pu. La. Deshpande Rahul Dravid Rakhi Purnima Rakhshabandhan Ramdas Swami Rangpanchami Republic Day Sachin Tendulkar San-Utsav Sandeep Khare Sandhyakal Saumitra Shala Shanta Shelke Shikshak Din Shivaji Maharaj Shivjayanti Shravan Shree Ram Navami Shri Parshuram Jayanti Shringar Shubh Din/Shubh Ratra Sindhutai Sapkal Sobat Sparsh Sukh Sundari Suprabhat Suresh Bhat Suvichar Swami Vivekanand Swapna Swapnasundari Swatantra Din Tu Tu Aani Me Tu Yetes Tevha Tujhyasathi Tujhyavina Tulsi Vivah Ukhane Va. Pu. Kale Vaat Vadhdivas Valentine's Day Vande Mataram Vapurza Vasu Baras Vat Savitri Veer Savarkar Jayanti Vel vidamban Vinda Karandikar Vinodi Vinodi Kavita Viraha Vishwas

लांबसडक त्या बोटामधुनी
झरझर झरते कण रांगोळी
होते रंग पुडीत लपले
भरभर ते पडले बाहेरी ।।
          रंगामागुन रंग साजिरे
. . . . .एकामागुन दुसरे आले
. . . . . रंगसंगती जमली का ते
. . . .  बघण्यासाठी जमले सारे ।।
ज्योत दिव्याची सुवर्ण पिवळी
आली बघण्याला रांगोळी
एकीसंगे दुसरी आली
ओळीमागुन रचल्या आेळी ।।
      प्रकाश दिसला तिमिर पळाला
. .  भवताल कसा तेजाेमय झाला
. . .रोज जाउदे नैराश्य लयाला
. . . सदा येउदे सुख उदयाला ।।
वैभवास येऊदे बरकत
राहू दे खणखणीत तब्यत
समाधान अन् शांति बरसत
आनंदे मन राहो विहरत ।।
       हिरे माणके हवी कशाला
. . . त्याहुन भारी तुमची संगत
. . . आपली मने भिडाे मनाला
. .  .जीवनात येऊदे रंगत ।।
      ॥ शुभ दीपावली ॥



*दिवाळीत अंगाला उटणे लावण्याची पद्धत*

__________________________

दिवाळीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे अंगाला लावण्याची पद्धत कशी असावी, याचे विश्लेषण येथे देत आहोत. उटणे हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावतांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून थोडेसे दाबून लावावे. प्रत्येक ठिकाणी दिलेली उटणे लावण्याची पद्धत त्या त्या पोकळीत असणार्‍यात्रासदायक वायूंच्या गतीला अनुसरून दिली आहे.


. *स्वतःला उटणे लावणे*

*१. कपाळ : कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे.
*२. कपाळाच्या दोन्ही टोकांना बाजूला भुवईजवळ : येथे लावतांना ते बोटांच्या अग्रभागांनी डावीकडून उजवीकडे (खालून वरच्या दिशेने), तसेच उजवीकडून डावीकडे (वरून खालच्या दिशेने) चोळून लावावे.
*३. डोळ्यांच्या पापण्या : यांवर लावतांना नाकाकडून कानाकडे हात फिरवावा.
*४. नाक :याला लावतांना उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंनी खालच्या दिशेने उतरत यावे अन् खाली आल्यावर उटण्याचा वास घ्यावा. उटण्याच्या वासातून प्रक्षेपित होणारा तेजाशी संबंधित गंध फुफ्फुसांतील वायूकोषात गेल्याने तेथील काळे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.
*५. मुखाचा वरचा भाग : या भागातून, म्हणजेच नाकाच्या खालून मधली तीन बोटे ठेवून आरंभ करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मुखाभोवती गोल, म्हणजेच हनुवटीच्या खड्ड्यातून वर स्वतःच्या डावीकडे जाऊन मुखाभोवतीचा गोल पूर्ण करावा.

*६. गालांच्या पोकळी : गालाच्या मध्यभागातून आरंभ करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोटांची अग्रे गोल गोल फिरवून लावावे.
*७. कानाची पाळी : ही तर्जनी आणि अंगठा यांमध्ये धरून तिथल्या तिथे हलवून उटणे लावावे.
*८. दोन्ही कान : दोन्ही कान हातांनी पकडून कानाच्या मागच्या बाजूला फक्त अंगठा ठेवून खालून वरच्या दिशेने फिरवावा.
*९. मान : मानेच्या मागून मध्यातून दोन्ही हातांची बोटे पुढे विशुद्ध चक्राकडे आणणे
*१०. छाती आणि पोट यांचा मध्यभाग : उजव्या हाताच्या तळव्याने छातीच्या मध्यरेषेवर वरून खालच्या दिशेने नाभीकडे हात फिरवत आणणे.
*११. काखेपासून कमरेपर्यंत : काखेपासून पितृतीर्थासारखा हात, म्हणजेच अंगठा एका बाजूला अन् चार बोटे दुसर्याम बाजूला ठेवून अंगाच्या दोन्ही बाजूच्या रेषेवरून वरून खाली या पद्धतीने फिरवावेत.
*१२. पाय आणि हात : हाताची बोटे फिरवत पायांवर आणि हातांवर वरून खालच्या दिशेने उटणे लावावे.
*१३. पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषा :पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषेवर अंगठा अन् तर्जनी यांनी विळखा घालून तो भाग कड्यासारखा घासावा.
*१४. डोक्याच्या मध्यभागी* : डोक्याच्या मध्यभागी तेल लावून ते हाताने घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवावे.

*दुसर्‍या व्यक्तीला उटणे लावणे*

*१. पाठ : दुसर्या व्यक्तीच्या पाठीला उटणे लावतांना पाठीच्या मणक्याच्या रेषेशी दोन्ही हातांच्या बोटांची अग्रे येतील अशा पद्धतीने वरून खालच्या दिशेने दोन्ही हात एकाच वेळी फिरवावेत.
*२. कंबर : दुसर्‍या व्यक्तीला लावतांना कमरेच्या आडव्या रेषेवर पाठीकडून तिच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे येऊन परत उजवीकडून डावीकडे जावे. असे परत परत लावावे.
🌞
संकलन - श्रीधर कुलकर्णी
*ज्ञानामृत मंच*

*२६ आक्टोबर*
*वसुबारस*
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ...
*शुभ दिपावली*




*दिवाळीचा फराळ*

दिवाळीच्या फराळाची दिवाळीत भरली सभा
लाडू आपला शिष्टासारखा मधोमध उभा.


चकली, करंजी , शेव सगळ्या बायका होत्या तोऱ्यात
लाडू, चिवडा, चिरोटा, अनरसा या पुरुषांना अपुरी पडली परात.

क्वचितच हजेरी लावणारे एकटे पडले कडबोळे

पण त्याच्या सोबतीला धावून गेले शंकरपाळे.

कुरकुरीत चकली दिसत होती उठून
तिच्या अंगावरचे तीळ दाखवत होती मिरवून.

झणझणीत चिवडा नाकी-डोळी लावत होता धार
पण दाणे, खोबरं, डाळ असा त्याचा पसाराच फार.

गोरी गुलाबी करंजी झाली होती देखणी
तिला पाहताच तिची सगळे करत होते वाखाणणी.

गुबगुबीत चिरोटा मूळातच फार नाजूक
त्याच्या जवळ येताच वास येत होता साजुक.

लाडू चिवडा दोघे मित्र बसले होते लगटून
छोटासा बेदाणा लाडू ला बसला होता चिकटून.

कडबोळे आणि शेव रंगाने मस्त
पण त्यांच्यामुळे फराळ होतो लगेच फस्त,

अधिक मासाचा लाडका अनारसाही होता हजर
जरा कमी आधिक झालं की त्याला लागते नजर.

असा हा फराळ दिवाळीची वाढवतो लज्जत
पण नीट नाही जमला तर बायकांची होते फज्जत

त्याचं माझं भांडण
हळुवार छेडणारे त्याचे हात
अन चोरुन दाद देणारे माझे नयन

त्याचं माझं भांडण
त्याने अलगद मिठीत ओढणं
अन माझा सोडवण्याचा लटका प्रयत्न


त्याचं माझं भांडण
त्याने हळुच खोडीन पदर ओढणं
अन माझं नाटकी मागं वळणं

त्याचं माझं भांडण
त्यान हळुच कुशीत शिरणं
माझं डोक्याभोवती हात फिरवणं

त्याचं माझं भांडण
त्यानं घट्ट वेलीसारखं बिलगणं
अन मी पापण्या झुकवणं

त्याचं माझं भांडण
त्यानं प्रेमान रागवणं
माझं त्यावर गाल फुगवणं

त्याचं माझं भांडण
त्यानं कान पकडुन साॅरी म्हणनं
अन माझं लाजून पाणीपाणी होणं

त्याचं माझं भांडण
एकमेकांच्या मिठीत विरघळणं
श्वासातश्वास घालुन एकमेकांसाठीच जगणं
त्याचं माझं भांडण,.........

- - अपर्णा पाटील



"माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी". - पु. ल. देशपांडे
.
.
"कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही.


लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत. बायका काय वाटेल ते बोलतात. "शी ! कसले हो हे भडक रंग !" लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा !

समोरची बाई म्हणत असते,

"कसला हा भरजरी पोत !"

हा शांत.

गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाहीतर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते.

समोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ, "अथोक्षजाय नम: । अच्युताय नम: । उपेंद्राय नम: । नरसिंहाय नम: ।" ह्या चालीवर सांगत असतो.

सगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच,
"ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं?"

एक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल; पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच.

आपली स्वतःची बायको असूनसुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते. पण कापडदुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात, "नारायण, इचलकरंजी लेमन घे"

खरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.

--------- पु. ल. देशपांड


भांडण

चंद्राचे नि माझे एकदा लागले भांडण..
भलताच भावनिक मुद्दा आणि भलतंच अवघड प्रकरण..

बाह्या सरसावून भांडू लागलो आम्ही एकेकाळचे दोस्तं..
भांडणाचं कारण एवढंच कि "त्याचं प्रेम श्रेष्ठ कि माझं प्रेम श्रेष्ठं...."

चंद्र म्हणे, "बघ मी आणि रात्र कसे भेटतो..?
आमच्या नुसत्या चाहुलीने सारा आसमंत कसा पेटतो..?

अश्या उसळतात लाटा आणि बेभान होतो समुद्र...."
बोलता बोलताच अजून उत्कटतेनं सांडू लागला चंद्र..

ऐक म्हणे, "आम्ही भेटताच होतं तारांगण लुप्त..
उरतो फक्त शुक्र, जो आधीपासूनच विरक्त आणि अलिप्त..

सारी सृष्टी गाऊ लागते मग आमचंच गुणगान..
मग मीही भरभरून देऊ लागतो त्यांच्या झोळीत चांदणदान..

सांग... हे असलं काहीतरी आहे का रे तुझं...?
सदानकदा तुझ्या डोळ्यांवर स्वप्नांचंच रे ओझं..

मग ती भेटो वा ना भेटो .. ओझी काही उतरली नाही..
आणि तुझी गाडीही पुढे काही सरकली नाही..

आठवतंय..? त्या रात्री खूप पाउस पडला होता बघ..!
तुला नव्हती सोसवत माझ्या चांदण्याची धग..

विनवत होतास मला, "जरा चांदणं आवरून घे..
आणि आता मला खरंखुरं उन दे..."

इथं मग होऊ लागली माझी गोची मात्र..
इतक्यात सोडून चालली त्याला त्याची रात्र..

कावरा बावरा होऊन त्याचे थरथरु लागले पाय..
म्हणालो मीही मिश्किलपणे "ओ चंद्रराव ... काय चाललंय काय..?"

रात्रीचे जसे जसे बदलू लागले रंग..
जरा फिके होऊ लागले चंद्राचेही अंग..

सूर्यबिंब जागं होऊन लागलं आभाळावर पसरू...
तो तो इकडे चंद्राच्या डोळ्यात जमू लागले अश्रू..

मग मीच म्हणालो त्याला जवळ घेऊन थोपटत त्याची पाठ..
"तुझी आणि माझी थोडीशीच वेगळी आहे वाट..

दोघांच्याही नशिबात पूर्ण सुख नाही.
आणि त्यात दोघांचीही काहीच चूक नाही.

आमच्यात जन्माचा दुरावा, व्यर्थ गेले सारे नवस
तुझ्या आणि रात्रीच्या आड आहे फक्त दिवस...

आता माझ्या डोळ्यातूनच अधूनमधून ती गळते रे.
दिवस सरला कि पुन्हा तुला रात्र मिळते रे..

युगानुयुगे चालूये हे, विनासायास.. विनाकष्ट..
घेतोय माघार मी, मान्यंय तुझंच प्रेम श्रेष्ठ.."

दिसू लागली त्याच्या डोळ्यात जरा पश्चात्तापाची झाक..
पाठ फिरवून मी चालू लागताच त्यानं दिली मला हाक..

"जाऊ नकोस रे माझ्यावर, नाराज होऊन असा..
माझ्या अंगा-अंगावर तुझ्याच कवितेचा रे ठसा..

झालो होतो मी कृतघ्न, झालो होतो पापी..
खरच माफ कर, मनापासून मागतो मी माफी..

तू होतास म्हणून तर मला मिळालं महत्व..
तूच तर जाणलंस माझ्यातलं काव्यतत्व..

नहितर होऊन राहिलो असतो मी दगड अंतराळातला..
कुणी केली असती माझी फुलांसोबत तुला..??

मी तुझी खपली अशी काढायला नको होती..
माझ्याकडून अशी आगळीक घडायला नको होती..

ती गेल्यावर, हक्कानं ठेवली होतीस तू मान माझ्या खांद्यावर..
श्रावणालाही लाजवणारी बरसली होती तेंव्हा सर..

किती काळ लोटलाय पण सर तश्शीच बरसतिये संततधार..
मलाच लाज वाटतीये आता, राजा मीच मानतोय माझी हार..

ती नाहीये तुझ्यासोबत पण तू नाहीयेस विसरत तिला...
मीच जातो कि रे सोडून पंधरा दिवस माझ्या रात्रीला.."

बोलता बोलताच कंठ दाटून चंद्र रडू लागला ढसाढसा..
पुन्हा एकदा त्याच्यावर उमटला माझ्या कवितेचा ठसा..

तेंव्हाच आम्ही दोघांनी घेतली शप्पथ, केला पण..
विसरून जायचं, दोघांमध्ये झालं होतं 'भांडण'..

आता हल्ली चंद्र जरा जास्तच समजून उमजून वागतो..
आणि मीही हल्ली लवकरच झोपतो.......... क्वचितच जागतो..

-चेतन दीक्षित



मुसळधार कोसळणारा पाऊस
सोबत दर्द रफीजींच्या आवाजातला
आणि कमी आहे फक्त तुझी

रिमझिम बरसणाऱ्या निवांत धारा
खमंग भजी चहा बशीतला
आणि कमी आहे फक्त तुझी


कडाडणाऱ्या विजा सोसाट्याचा वारा
समोर तरळणारा प्रसंग आठवणीतला
आणि कमी आहे फक्त तुझी

छतावरून गळणारे टप टप थेंब
ओघळणारा कण कण माझ्या डोळ्यातला
आणि कमी आहे फक्त तुझी

प्रज्ञा रायकर जोशी

सांजेच्या काठावरती
अलवार क्षणांच्या भेटी
ही प्रीत आपली आहे
की शतजन्मांच्या गाठी...
कोणती तपस्या केली
ज्याने तू माझी झाली
आयुष्य घेतले माझे
थरथरत्या पदराखाली...
एकांत भावतो मजला
जो तुझी आठवण देतो
हा तुझ्या दिशेचा वारा
येतो अंगास बिलगतो...
एवढा दुरावा असुनी
भेटतो मनाने आपण
मग कायेवरती चढते
नाजुक स्पर्शांचे लेपण..
बोटाने नाव गिरवतो
वाळुत मुलायम ओल्या 
तू दिसते नावामध्ये
मन कातर झाल्या झाल्या...
ओंजळीस आयुष्याच्या
तू ओंजळ लाव तुझीही
पेटता दिवा प्रेमाचा
नाही विझणार कधीही...
-- संतोष



*तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी,*
*हैरान हूँ मैं*
*तेरे मासूम सवालों से,*
*परेशान हूँ मैं.....*


किती वर्ष झाली हे गाणे ऐकतोय/बघतोय पण, कधी पण हे गाणे ऐकताना वेगळाच आनंद मिळतो. कधी गुलजार यांची शब्दरचना, त्याच्यातील तरलता आणि सहज सुंदर शब्द तर कधी आरडींचे संगीत आणि या दोघा दिग्गजांना तितक्याच ताकदीने साथ देणार्या गायकांची कमाल...
लता मंगेशकर आणि अनुपजींची.....

मला अनुपजींचे हे गाणे जास्तच आवडते. त्याला कारण आहे त्याचे पिक्चरायझेशन्स खुप छान झाले आहे. नसिरुद्दीन आणि निळ्या डोळ्याचा निरागस मुलगा आणि त्या गाण्यातील दर्द अनुपजीनी सही गायला आहे.
एखादा सिनेमा हा वर्षानुवर्षे लक्षात रहातो आणि ताजातवाना वाटतो आणि आताच्या काळाशी सुध्दा सुसंगत वाटतो, त्यातीलच *'मासुम'* हा सिनेमा. अभिनय, संगीत, संवाद आणि डायरेक्शन्स याबाबतीत तर लाजवाब.
*या गाण्यातील प्रत्येक ओळ, शब्द हे मनाला हलकेच स्पर्श करतात आणि जीवनाचा अर्थ तपासुन पहायला भाग पाडतात.*

तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी,
हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालों से,
परेशान हूँ मैं.

खरच आपल्या आयुष्यात असे किती तरी वेळा असे साधे-साधे प्रश्न येतात, ज्याची आपण उत्तरे शोधायची प्रयत्न करतो ....
कधी मिळतात तर कधी तसेच सोडुन द्यावे लागतात ......

जीने के लिए सोचा ही नहीं
दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो मुस्कुराने के
क़र्ज़ उतारने होंगे
मुस्कुराऊं कभी तो लगता है
जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है

प्रत्येक माणसाची राहिलेली काही स्वप्न, काही ईच्छा किंवा काही झालेल्या चुका..... ज्या आपल्याला बरोबर घेऊन आपले आयुष्य हे जगावेच लागते आणि मग कधी कधी अचानक जगता जगता लक्षात येते कि आपण जे हे हसतो आहोत, आनंद घेतो आहोत याचे देणे आपण एकतर दिलेले असते किंवा द्यायचे बाकी असते. अशी काही दुखे असतात की आपल्याला ती बरोबर घेऊन सर्वांपासुन लपवुन हसत हसत जगावेच लागते ....
जणु काही हा दु:खे म्हणजे, जगण्यासाठी घेतलेली कर्जच असतात. अन् ती फेडावीच लागतात .

ज़िन्दगी तेरे गम ने हमें
रिश्ते नए समझाए
मिले जो हमें धूप में मिले
छाँव के ठन्डे साये

किती सुंदर कडवे आहे, हे अगदी खरय आपल्या आयुष्यात येणार्या दु:खानीच आपल्याला खरी नाती लक्षात येतात. उन्हामध्ये जश्या थंड सावलीचे भास होतात तसेच या काळात खोटी सहानुभूती दाखवणारेच जास्त भेटतात.

आज अगर भर आई है
बूंदे बरस जाएगी
कल क्या पता किन के लिए
आँखें तरस जाएगी
जाने कब गुम हुआ कहाँ खोया
इक आंसू छुपा के रखा था

आज असे वाटते की ज्या भावना मी जगापासुन लपवुन ठेवल्या आहे त्या आज बरसुन जातील ... तर काय सांगता येते कुणाच्या येण्याची वाट बघता बघता हे डोळे शुष्क होउन जातील ..... या साठीच एक अश्रू लपवला होता, काय माहिती तो हरवला कि गायब झाला.... !!!!

असे हे सगळे सहन करत आनंदाने *जगायचे असते* .....
*जगायचे असते.*

*(आयुष्य एक प्रवास )* 🔅🔆🌻

तो बाप असतो.....

पोरांना नवीन कपडे आणल्यावर
शर्टच्या फाटलेल्या कॉलरमध्ये लपलेला तो बाप असतो,
फाटक्या H.M.T च्या घड्याळाच्या
पट्ट्यात मनगटावर अर्धवट तुटलेला तो बाप असतो.....

लेकराच्या सोयरिकीसाठी दारोदारी उंबरे झीजवून
क्षीणलेला,रोज थकणारा तो बाप असतो,
पोरीच्या लग्नासाठी मंडप,आहेर,आणि
वाजंत्रीचे हप्ते देतादेता स्वतःला पुरत विकणारा तो बाप असतो....

छकुलीच्या पाठवणीला आभाळ डोळ्यात साठवून
नंतर एकांतात ढसाढसा रडणारा तो बाप असतो,
लाईट गेली म्हणून घरी मेणबत्त्या नेताना
अंधारात एकट्याने धडपडणारा तो बाप असतो.......

मन मारून इच्छा सोडून पोरा बाळांमध्ये
स्वतःला बघणारा तो बाप असतो,
अधाशी पोटाच्या खळगीने हसत “जेवलो म्हणत”
रोज उपाशी जगणारा तो बाप असतो......

रोज सूर्यासारखा उगवणारा आणि सगळ्यांना झोपवून
चंद्रासारखा मावळणारा तो बाप असतो,
दुखामध्ये,अडचणीमध्ये आधार बनून
सगळ्यांना सावरणारा तो बाप असतो......
सगळ्यांना सावरणारा तो बाप असतो......!!!!

-अक्षय भिंगारदिवे,
१९ जून २०१६,

तुला म्हणून सांगते .....

पुन्हा पुन्हा शहारते, तुला म्हणून सांगते,
मिठीत वेड वाढते, तुला म्हणून सांगते .....

जिथे जिथे खुणा तुझ्या, वसंत पेरतो सख्या,
तिथेच मी विसावते, तुला म्हणून सांगते......

तुझी प्रिया तुझ्यासवे, नभात झेप घ्यावया,
गगनझुलाच मागते, तुला म्हणून सांगते ....

नजर कधी न लागण्या, तुला कुण्या सुरंगिची,
इथून दृष्ट काढते, तुला म्हणून सांगते.....

तुझे अबोल राहणे, दिशात शून्य पाहणे,
क्षणात मौन वाचते, तुला म्हणून सांगते....

धुक्यास पांघरून मी, तनामनास जाळते,
दवात रात जागते, तुला म्हणून सांगते......

तुझ्याच आरशातला, चुकार चेहरा पुन्हा,
नव्या ऋतूत पाहते, तुला म्हणून सांगते ......

माधुरी

तु सोडुन गेलेल्या वाटांवरती, आता मी देखिल फिरकत नाही
तुला सोबत न घेउन आलेलं, बहुदा त्यांनाही ते आवडत नाही
अशी आल्यापावली माझी कितीदा परत पाठवणी केलीय त्यांनी.................तुझ्यासाठी

तु दिसत नसलेल्या सांजेपासून, बेलगाम उधळलाय तो
प्रत्येक ओहोटीशी झुंज देत, तुझ्या शोधात निघालाय तो
हर भरतीला वेड्यापरी सगळे किनारे पिंजुन काढलेत त्याने....................तुझ्यासाठी

आजकाल तु या गावात नसतेस, हे बहुदा कळलयं आहे त्याला
खुणेच्या सगळ्या जागांवर अडला, तरी भेटली नाहीस त्याला
आजही तुझ्या आठवसरीं डोळ्यांत साठवुन पुन्हा पुन्हा दाटुन येतो तो............तुझ्यासाठी

तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस्त झालाय
खिडकीत तुझी वाट पाहुन, कित्येकदा ओसरीवरुनच परत गेलाय
जाताना मात्र सवयीने अंगणात पारिजातकाचा सडा सांडत जातो तो...........तुझ्यासाठी

हे सगळे माझ्याकडे "तुला" मागतात्, पण मी दाद देत नाही
तुला गमावल्याचा दोष मला लावतात्, तरी मी काहीच बोलत नाही
तुझ्या प्रतारणेच्या जखमा उरात दडवून आता कायमचा शांत झालोय मी..........तुझ्यासाठी

एक एकटा एकटाच

पाऊसवेळा

तू केस झटकलेस
चेहर्यावर पाऊस आला …
चेहरा झाकला हातांनी
ओंजळभर पाऊस आला…

पदर उडाला झुळकेने
वार्यावर पाऊस आला …
तू हसून पाहिलं जरा
काळजावर पाऊस आला…

एकच कविता वाचलीस
डायरीभर पाऊस आला,
आंगणातून थोडं डोकावलस
पायरीवर पाऊस आला!!

मेघांना आर्जवे केलीस
प्रहरभर पाऊस आला …
एकदा भिजली जराशी
शहरभर पाऊस आला!!

– उनाड

आयुर्वेदात सांगितले  आहे की जिथे जिथे डाळी शिजवून वापरल्या जातात तिथे साजुक तूप नाजुकपणे वापरायचे नाही. म्हणजे सढळ हस्ते पोळीवर घ्यावे. म्हणजे डाळीने वाढणारे पित्त कमी होते.
पण तुपाने कोलेस्टरॉल वाढेल त्याचे काय ?
त्यासाठी आपण करतो कटाची आमटी. या आमटीतील काळा मसाला, कढीपत्ता, तमालपत्र इ. कोलेस्टरॉल कमी करते.

आहे होळी
खा पोळी
वाटी तुपाची
आमटी कटाची
नका करू काळजी
आरोग्याची.

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !…..

रणरणत्या उन्हात अनवाणी
कमरेवर घागर घेऊन
बालिका चालतेय भरभर
घर आहे अजून दूरवर

शाळेत शिकण्याचे वय
आणि निरागस मन
भाळी तिच्या आज असे
पाण्यासाठी वणवण

खिन्न झाले माझे मन
हे दृश्य पाहून
वापरावे पाणी जपून जपून
हाच संकल्प करुया आपण

- प्राची देशपांडे

कोरी पाटी...
लहान मुलांचं मन ,
म्हणजे कोरी पाटी,
आईच्या हातात खडू,
त्यावर लिहिण्यासाठी
आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
आई म्हणायची संध्याकाळची, झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात,
होत नाहीत पुढे.
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही वाटत नाही,
खरं बोलायचं भय.
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग,
लावायची कोणाला लागली लाथ तर,
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवते सगळं,
जरी आता सगळं माझ्या हातात!
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड व्हायच्या पापण्या अन
मिटायचे डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ वाटून खायचे सात.
आई घालायची वाट पाहतांना
कोपऱ्यात पालथा पेला,
एव्हढा भाबडा विश्वास हिने
कुठून पैदा केला?
आई म्हणायची,......,आई म्हणायची,
आता खडू माझ्या हाती,
होता येईल का मला
असं माझ्या चिमण्यासाठी??

आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त मनपुर्वक शुभॆच्छा....
महिला ही कधी लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवॆश करतॆ व ती आपल्या आयुष्यात नानाविध रूपात प्रकट होतॆ, ती अशी......
माय तु कुणाची, बहिण तु कुणाची..सासु तु कुणाची, तर सुन तु कुणाची....
वात्सल्य तुझ्यात, प्रॆम तुझ्यात..करूणा तुझ्यात, उदारता तुझ्यात....
या क्षितीजावरील लता तु, आशा तु शॆवंती तु अन् बकुळी तु...
जाईजुई तु , रातराणी तु, कुसुमॆ तु, सुमनॆ सुद्धा तु.....या सर्वांमधील दरवळणारा सुवास तु....
तु आहॆस तरी कुणाची, किती रूपांची, कुणालातरी उमजॆल का तु ?
मायॆचा पंख पसरूनी, या क्षितीजावरती आणलॆस तु , संसाराच्या वृक्षवॆलीवर बहरलॆल फुल तु....
कधी गंगा तु , कधी गोदावरी तु...कधी नर्मदा तु तर कधी कृष्णा तु....
इच्छा तु, जिद्द तु, आकांक्षा तु, अन् स्वप्नही तु....
कधी राधा तु, कधी मीरा तु...कधी पार्वती तु, तर कधी सरस्वती तु....
कधी मुक्ता तु, कधी अहिल्या तु..कधी सावित्री तु, तर कधी रमाई तु....
कधी लक्ष्मी तु, कधी इंदिरा तु, कधी जना तु...कधी बहिणा तु, तर कधी बदलत्या जगाबरोबर बदलणारी आधुनिक स्री तु....
कशाकशात सामावलीस तु , आई-वडील, पती, मुलॆ, नातॆवाईकांची दु:खॆ आपल्यात सामावुन घॆणारी प्रॆमळ स्री तु...
तु आहॆस तरी कुणाची, किती रूपांची, किती मोठ्या मनाची, कुणालातरी उमजॆल का तु......


आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते
बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळूवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा
असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातुन ज्या रोज जातो मुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा
न अंदाज कुठले न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे न अनुमान काही
कशी हि अवस्था कुणाला कळावी
कुणाला पुसावी कुणी उत्तरावे
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे
गीतकार : संदीप खरे, गायक : संदीप खरे - सलील कुळकर्णी
https://www.youtube.com/watch?v=9MIkW0vnV2I

Be Practical
आपल्या ब्लॉग च्या वाचक दिपाली भोसले यांचा हा पहिला Blog.
आजच्या तरुण मंडळीच्या मनामनातील विचारांना दिलेला एक वेगळा प्रयत्न

कोणी म्हणतं seven days and six nights चं package म्हणजे प्रेम...???
मी म्हणतो चांदणी रात्र,
एक झोपाळा, आणि
हातात तिचा हात म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं पॅरीसच्या
संध्याकाळची रोषणाई म्हणजे प्रेम....
मी म्हणतो तिला अचानक
भेट दिली की,
तिच्या डोळ्यातली ती
चमक म्हणजे प्रेम!
कोणी म्हणतं काश्मीरच्या बागेत एकत्र फिरणं म्हणजे प्रेम....??
मी म्हणतो न सांगता एखादा गजरा तिच्या डोक्यात माळणं म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं फॅन्सी आणि स्टाईलिश कपडे घालून नवऱ्याबरोबर फिरणं म्हणजे प्रेम.... ?
मी म्हणतो सणाच्या दिवशी नटलेल्या तिच्याकडे डोळे भरून पहाणं म्हणजे प्रेम!
कोणी म्हणतं तिला गुलाबाचा गुच्छ देणं म्हणजे प्रेम.... ???
मी म्हणतो सगळ्यां देखत
एक क्षण चोरून तिला
"छान दिसतेस"
असं म्हणणं आणि
ते ऐकून तिचा चेहरा
गुलाबी होणं म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं तिच्या सुंदरतेवर कविता करणं म्हणजे प्रेम....???
मी म्हणतो ती माहेरी असताना
प्रत्येक कवितेत तिला पाहणं
म्हणजे प्रेम !
कोणी म्हणतं लाजेचा पडदा काढून एकामेकांना जाणून घेणं म्हणजे प्रेम....???
मी म्हणतो लग्नाच्या
१५ वर्षानंतर सुद्धा
उखाणा घेताना लाजणं
म्हणजे प्रेम !

आजही पाकिटात कधीतरी दडवलेली
जुनी शंभरची नोट सापडली आणि
मनापासुन आनंद झाला तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

भर पावसात बाईक थांबवून
रस्त्याशेजारच्या टपरीवरच्या गरमागरम
भज्यांचा आस्वाद घ्यावासा वाटला
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

जुने, साधेसुधे शाळकरी मित्र
भेटल्यावर, त्यांना पूर्वीसारखी
कडकडून मिठी माराविशी वाटली
तर समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

साबणाची वडी चपटी होईपर्यंत
वापरता आली, टूथपेस्ट अजूनही
शेवटपर्यंत पिळता आली तर समजावं
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

आईने किसलेल्या खोबर्याचा आणि
शेंगदाणा कुटाचा न लाजता बकाणा
भरता आला तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

तुमच्या गरीब मित्राने कर्ज काढून
घेतलेल्या बाईकचं,
घरगड्याने आठवडा बाजारातून घेतलेल्या शर्टाचं ,
आणि मध्यमवर्गीय शेजारणीच्या
पाचशेच्या साडीचं...
मनापासुन
कौतुक करता आलं की समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

चाळीतल्या दिवसांच्या,
विटीदांडूच्या-लगोरी-गोट्यांच्या
खेळांच्या आठवणीत मन रमू शकलं
तर समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

मुलीला बार्बी खरेदी करताना,
घराशेजारच्या बांधकामावर आईबाप
काम करत असलेल्या तिच्या
समवयस्क छोटीसाठीही एखादं खेळणं
आठवणीने खरेदी केलत तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

इटालियन-मॅक्सिकन फुड खाताना,
बाबांच्या कमी पगारांच्या दिवसांतली
पोळीभाजी आठवली तरी समजावं,
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत...

नवं समृद्ध आयुष्य जगताना, जुने कष्ट आठवले,
ज्यांनी आयुष्य घडवलं ती
मंडळी नुसती आठवली,
तरी समजावं...
अजूनही आपले पाय जमिनीवर आहेत....

"जमेल तसे प्रत्तेकाने ...
.....कुणावर तरी प्रेम करावे ...
कधी संमतीने ..कधी एकतर्फी ..
पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!!
प्रेम सखीवर करावे ..
बहिणीच्या राखीवर करावे ..!
आईच्या मायेवर करावे ..
बापाच्या छायेवर करावे ..!
प्रेम पुत्रावर करावे ..जमल्यास ,
दिलदार शत्रूवर हि करावे ..!
प्रेम मातीवर करावे ..
निधड्या छातीवर करावे ..!
शिवबाच्या बाण्यावर ...लताच्या गाण्यावर
प्रेम ..सचिन च्या खेळावर आणि
वारकर्यांच्या टाळाव र हि करावे !
प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे ..
प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!!
महाराष्ट्राबरोबरच ..देशावर ...आणि ,
अगदी ..न चुकता .स्वतःवर ...जमेल तसे प्रेम
करावे .!!!!!!



माझ्या बाईकच्या
मागच्या सीट वर बसून
मला घट्ट बिलगली होतीस
तेव्हाच..
एक अनामिक नातं
वेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस
.
परिस्थितीच्या काचेवर
एकाबाजूने मी हात ठेवताच
दुसऱ्याबाजूने तू
बोटाला बोट मिळवून हात ठेवला होतास
पाणीदार डोळ्यातून
किती बोलली होतीस
तेव्हाच एक धागा विणला गेलेला
त्या काचेच्याही आरपार
.
कीतीदातरी
प्रत्यक्ष आणि फोनवरही
निशब्दातच..
बोललीस माझ्याजवळ
तेव्हा
त्याच नात्यामुळे
त्याच धाग्यामुळे
सहज पोहोचलीस खोल मनात
तुला कळतच असेल, हो ना?
- तुषार जोशी

तसे भेटणे ना पुन्हा व्हायचे. .
उन्हे गात होती जरी त्याक्षणी
तश्यातच मला भेटलेली कुणी 
जरा सावळीशी तनू लाजरी
किती बोलली फक्त नजरेतुनी…
तिचे पास येणे जरी थोडके
जसे सोबती अंतराचे धुके
असा हरवलो त्या क्षणातून मी
तिला पाहतानाच स्पंदन चुके…
तिचा हाती हाती तरी घेतला
खुळा स्पर्श झाला शहा-यातला
उन्हे पेटली भर दुपारी तरी,
इथे मात्र हा गारवा वाढला...
तशी वेळ ती फक्त दोघातली
म्हणूनच मिठीला मिठी मारली
तिच्या बाहुपाशी असा गुंतलो
जणू गाठ रेशिम कुणी बांधली…
फुले श्वास, रोमांच देहावरी
तरी सोडवेना मिठी भरजरी
जरी या क्षणा आठवू पाहतो
तरी आठवे ती मला लाजरी...
खुले केस पाठीवरी सोडूनी
मला भासली ती जणू कामिनी
तिच्या धुंद गंधात गंधाळता
इथे दरवळे भेट हृदयातुनी. .
अधर स्पर्शता लाजली बावरी
"नको ना, नको ना" उगी बोलली
तिचे लाजणे जीवघेणे असे
नकारातही हाय ती हासली. . .
किती शांत एकांत द्यावा तिने
जिच्या सोबती मोहरावी क्षणे
अता फक्त आठव मला यायचे
तसे भेटणे ना पुन्हा व्हायचे…
पूजा भडांगे

MarathiKavitaBlog

{facebook#https://www.facebook.com/marathikavitablog} {twitter#https://twitter.com/mkavitablog} {google-plus#https://plus.google.com/+MarathikavitablogBlogspot} {instagram#https://www.instagram.com/marathikavitablog/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget