Halloween Costume ideas 2015

आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.

2015
Aai Aai/Baba Aarti Prabhu Aashadi Ekadashi Aathvan Aayushya Adarsh Vyaktimatva Akshay Tritiya Anna Hazare Ashru Baba Baiko Balasaheb Thackeray Balpan Bhaubeej Bhavana Bhet Breakup Chandrashekhar Gokhale Charolya Cricket Dasara Datta Jayanti Dev Dhantrayodashi Din Vishesh Diwali Dr. Ambedkar Jayanti Dukh Durava Ektepana Gadge Maharaj Ganpati Gokulashtami Gudi Padwa Guru Poornima Hanuman Jayanti Holi Itar Kavita Jagatik Mahila Din Jai Satguru Jivan Kamlesh Gunjal Kavi Grace Kojagiri Purnima Kshan Premache Kusumagraj Lagna Lakshmi Pujan Lal Bahadur Shastri Lata Mangeshkar Lokpriya Kavi Maasaheb Jijabai Jayanti Maharashtra Din Mahashivratri Mahatma Jyotiba Phule Maitri Maitri Divas Maitrin Makar Sankranti Mangesh Padgaonkar Mann Marathi Bhasha Din Marathi Kavita Marathi Lekh Marathi Prem Kavita Mithi Mitra Mumbai Terrorist Attacks Najar Nanashaheb Dharmadhikari Narali Purnima Nate Nav Varsh Navratri Odh Pahila Paus Pahila Prem Pahili Bhet Pandharpur Wari Paus Kavita Prajasattak Din Prem Prem Divas Prem Mhanje Nakki Kai Aste Prem Patra Premat Priyasi Pu. La. Deshpande Rahul Dravid Rakhi Purnima Rakhshabandhan Ramdas Swami Rangpanchami Republic Day Sachin Tendulkar San-Utsav Sandeep Khare Sandhyakal Saumitra Shala Shanta Shelke Shikshak Din Shivaji Maharaj Shivjayanti Shravan Shree Ram Navami Shri Parshuram Jayanti Shringar Shubh Din/Shubh Ratra Sindhutai Sapkal Sobat Sparsh Sukh Sundari Suprabhat Suresh Bhat Suvichar Swami Vivekanand Swapna Swapnasundari Swatantra Din Tu Tu Aani Me Tu Yetes Tevha Tujhyasathi Tujhyavina Tulsi Vivah Ukhane Va. Pu. Kale Vaat Vadhdivas Valentine's Day Vande Mataram Vapurza Vasu Baras Vat Savitri Veer Savarkar Jayanti Vel vidamban Vinda Karandikar Vinodi Vinodi Kavita Viraha Vishwas

" सरणारे वर्ष मी "
-----------

मी उद्या असणार नाही
असेल कोणी दूसरे
मित्रहो सदैव राहो
चेहरे तुमचे हासरे

झाले असेल चांगले
किंवा काही वाईटही
मी माझे काम केले
नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानु
तुमची माझी नाळ आहे
भले होओ , बुरे होओ
मी फक्त " काळ " आहे

उपकारही नका मानु
आणि दोषही नका देऊ
निरोप माझा घेताना
गेट पर्यन्त ही नका येऊ

उगवत्याला " नमस्कार "
हीच रीत येथली
विसरु नका ' एक वर्ष '
साथ होती आपली

धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला
तुम्ही मला खुशाल विसरा
दोष माझा प्राक्तनाला

शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही
मी माझे काम केले
बाकी दूसरे काही नाही

निघताना " पुन्हा भेटु "
असे मी म्हणणार नाही
" वचन " हे कसे देऊ
जे मी पाळणार नाही

मी कोण ? सांगतो
" शुभ आशीष " देऊ द्या
" सरणारे वर्ष " मी
आता मला जाउ द्या।

प्रेंम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमच आणि आमचं अगदी सेम असतं
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वाटतात ?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे ,
फसल्या तर फसू दे .

तरीसुद्धा
तरीसुद्धा ,
प्रेंम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तूमच आणि आमचं अगदी सेम असतं .
मराठीतून "इश" म्हणून
प्रेम करता येत ,
उर्दूमध्ये "इश्क़ " म्हणून
प्रेम करता येत .
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येत .
Convent मध्ये शिकलात तरी
प्रेम करता येत
सोळा वर्ष सरली कि अंगात फुल फुलू लागतात .
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलु लागतात .
आठवत ना ?
तू मची माझी सोळा जेव्हा
सरली होती ,
होडी सगळी पाण्याने
भरली होती ?
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो .
होडी सकट बुडता बुडता
वाचलो होतो .
बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं ,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं .
तूम्हाला ते कळल होतं .
मला सुद्धा कळलं होतं !
कारण ,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तूमच आणि आमचं अगदी सेम असतं .
"प्रेमबीम झूठ असतं ",
म्हणणारी माणसं भेटतात .
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं,
म्हनणारी माणसं भेटतात !
असाच एक जन
चक्क मला म्हणाला ,
"आम्ही कधी बायकोला
फीरायला नेलं नाही !
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधी सुद्धा केलं नाही !
आमचं काही नडला का ?
प्रेमाशिवाय अडला का ?
त्याला वाटलं मला पटल !
तेव्हा मी इतकाच म्हटलं :
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ,
तूमच आणि आमचं मात्र सेम नसतं.
तीच्यासोबत पावसात कधी
भीजला असाल जोडीने !
एक chocolate अर्ध अर्ध
खाल्ला असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत
तासंतास फिरला असाल !
झंकारलेल्या सर्वस्वाने
तीच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं
डोळ्यानीच हसणं असतं ,
प्रेम कधी भांडतं सुद्धा !!
दोन ओळींची चिठी सुद्धा प्रेम असतं ,
घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं ,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !!
-कविवर्य मंगेश पाडगावकर .
खुपच वाईट बातमी..! साहित्य जगतामधला महान तारा निखळला.....!
बाकीचे सगळे भास असतात,
सोबतीला अखेरपर्यंत
आपलेच फक्त श्वास असतात...!
कवी मंगेश पाडगावकर यांना विनम्र श्रद्धांजली....!

मिसेस साठे आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. साठे बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना,
“Love You All”
असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही.
पण त्यांना जाणवलं की, खरंतर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत.
त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता.
तो मुलगा अगदी अव्यवस्थित, गबाळा असा होता आणि साठे बाईंना त्याच्याबद्दल प्रेम
किंवा आत्मीयता वाटेल असं, त्यांची दखल घ्यावी असं, काहीही नव्हतं !
त्या मुलाशी जरा अलिप्तपणेच त्या वागायच्या.
कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी बऱ्याचदा त्याचंच उदाहरण द्यायच्या आणी कोणत्याही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या.
पहिली तिमाही झाली.
प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले. त्याही मुलाची ‘प्रगती’ त्यांनी लिहिली.
शाळेची अशी पद्धत असते की, प्रगतिपुस्तकावर शेवटी मुख्याध्यापिकेची सही होते.
त्याप्रमाणे प्रगतीपुस्तके सहीसाठी गेली.
मुख्याध्यापिकेने साठे बाईंना बोलावून घेतले.
त्या म्हणाल्या, “अहो प्रगतिपुस्तकात ‘प्रगती’ लिहायची असते.
पालकांना कळायला हवे, की त्यांच्या मुला-मुलींना काही भवितव्य आहे.
या शैलेशबद्दल तुम्ही काहीच लिहिले नाहीये. असं कसं चालेल? त्याच्या पालकांना काय वाटेल ? अहो त्याला ते मारतीलसुद्धा एखादेवेळी !”
साठे बाई म्हणाल्या, “मी त्या मुलाचं करू तरी काय ? अहो, सकारात्मक काहीच नसेल, काही प्रगती नसेलच तर मी तरी काय लिहू ?”
“ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा,” मुख्याध्यापिका म्हणाल्या.
मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले,
आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके काढून आणायला सांगितले. आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके साठे बाईंकडे पाठवून दिली.
साठे बाईंनी प्रगतिपुस्तके चाळायला सुरुवात केली.
तिसरीच्या प्रगतीपुस्तकावर शेरा होता,
“शैलेश हा वर्गातील सगळ्यांत हुशार विद्यार्थी आहे!”
त्याना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी चवथीचे प्रगतीपुस्तक पाहिले,
त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे सुचवत होते की,
त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली येतो आहे.
त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरने ग्रासले होते आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोचला होता. त्यांची आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती.
आणि ते हळूहळू त्या शेऱ्यांमधून ध्वनीत होत होते.
सहावीत शेरा होता,
“ शैलेशने त्याची आई गमाविली आहे आणि तो स्वत:ही हरवल्यागत झाला आहे.
आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नाहीतर आपण त्याला गमावू !
आतापर्यंत साठे बाईंच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या. म्हणाल्या,
“मला कळले काय करायला पाहिजे ते !”
पुन्हा सोमवारी, त्या वर्गावर गेल्या आणि वर्गावर नजर फिरवून नेहमीप्रमाणे म्हणाल्या, “love you All”!
पुन्हा त्यांना जाणवलं की आपण खरं बोलत नाही आहोत.
कारण त्याना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा कैक पटींनी जास्त माया आता शैलेशविषयी वाटत होती !
त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होतं.
आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता.
त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या.
दिवस जात होते.
शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी teacher साठी छान-छान गिफ्ट्स आणल्या होत्या.
एकच ‘गिफ्ट’ एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेली होती.
शिक्षिकेच्या अंत:प्रेरणेने त्यांनी ओळखले, ही कोणाची गिफ्ट आहे ते.
एक अर्धी वापरलेली परफ्युमची बाटली आणि दोन खड्यांच्या बांगड्या.
एका बांगडीतले दोन खडे आधीच निखळलेले होते.
सगळी मुले हसली. त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखलं.
काही न बोलता साठे बाईंनी तो परफ्युम आपल्या साडीवर उडवला. त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या.
आता शैलेशचा चेहेरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला,
“आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या साडीला येतोय!”
“ती मला सोडून गेली त्या आधी, तिने वापरलेला हा शेवटचा परफ्युम होता.
आणि शेवटी तिच्या हातात ह्याच बांगड्या होत्या !”
एक वर्षानंतर,
म्हणजे शाळा संपली तेव्हा, साठे बाईंच्या टेबलावर एक पत्र होते. “मला जेव्हढे शिक्षक-शिक्षिका लाभल्या, त्यातल्या तुम्ही सर्वांत छान आहात.”- शैलेश.
त्यानंतर बरीच वर्षे, शैलेशकडून याच आशयाचे पत्र त्यांना दर वर्षी मिळत असे.
वर्षे निघून गेली.
त्यांचा संपर्क राहिला नाही. दरम्यान, त्या निवृत्तही झाल्या. अचानक त्याना एक कुरिअर शोधत आला. त्याने एक पत्र त्यांना दिले.
त्यावर प्रेषक म्हणून नाव होतं, डॉ. शैलेश, Ph.D.
या दरम्यान, शैलेश मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केली होती. डॉक्टरेट मिळविली होती.
पत्रात तीच ओळ पुन्हा होती. थोड्या फरकाने.
“मला जगात खूप माणसे भेटली. पण तुम्ही सर्वांत छान आहात !”
“मी लग्न करतोय. आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही.”
सोबत विमानाची दोन तिकिटे होती. जायचे आणि यायचे.
साठे बाईंकडे आता तो परफ्युम नव्हता.
पण त्या बांगड्या मात्र अजूनही त्यांच्या हातात होत्या.
साठे बाईंना राहावले नाही. त्या लग्नाला गेल्या. तिथे अपरिचितच जास्त होते.
त्यामुळे त्या मागच्या एका रांगेत बसून चाललेला सोहळा पाहात होत्या. मात्र कुणीतरी त्यांना शोधत होते. त्यांनी त्यांना ओळखले आणि पहिल्या रांगेकडे नेले.
तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी लावलेली होती,
“आई”.
त्यांना पाहताच, सोहळा थांबवून शैलेश त्यांच्यापाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने
खुर्चीवर बसविले. पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे, तो केवळ तुमच्यामुळेच.
लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला,
“हया नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो !”
त्यावर साठे बाई उत्तरल्या,
'शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं,
की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक' !

।।दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।।
या मंत्रा मध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी- त्याचे अनुसंधान. मी देह नाही. मी आहे आत्मा.तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम्.तो साक्षी आहे. निर्विकार आहे.अानंदरूप आहे.पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहम् ला हाक मारली आहे.
दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रम्हाचे अनुसंधान केले आहे.आपल्या भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे.वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे,परब्रम्हच आहे.परब्रम्हानेच ही अनेक भासणारी रुपे धारण केली आहेत.त्या परब्रम्हाला दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली आहे.
श्रीपादवल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपादवल्लभांना हाक मारली आहे.श्रीपादवल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत.ते भगवंताचेच अवतार आहेत.त्यांना संबोधन केले आहे.
चौथ्या दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे.माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा. मला लवकर आपल्या जवळ न्या. आपले स्वरुप मला प्राप्त होऊ दया. मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे.तो भ्रम नाहीसा करा. अहं ब्रम्हास्मि हा अनुभव मला येऊ दया. आपल्या सारखी दिगंबर स्थिति मलाही दया. अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दात आहे.
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा ।।
प.पू. श्री दत्तमहाराज कवीश्वर

२२ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला विंटर सोल्स्टाईस, असे म्हणतात. या बिंदूवर सूर्य असताना हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्रही सर्वात मोठी असते. २२ डिसेंबरचा दिवस हा १० तास ४७ मिनिटांचा असतो. दिवस व रात्रीचा कालावधी कमी-जास्त होणे आपण नेहमीच अनुभवतो.

हिंदू संस्कृती मध्ये आजच्या दिवसाचे फार महत्व आहे. आजपासून ६ महिने सूर्य उत्तर धृवाकडे वळतो. अर्थात सूर्याचे उत्तरायण सुरु होते. आजच्या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे.

पौराणीक कथेनुसार आजच्या दिवशी महाभारतातील भीष्मपितामह त्यांनी आपला शरपंजर देह सोडला. त्यांना इच्छा मरण प्राप्त झाले होते. या दिवशी सर्व पित्र उत्तर दिशेला स्थलांतर करतात म्हणूनच याला 'पित्रायण' सुद्धा म्हणतात.

आजच्या दिवशी नैसर्गिक मृत्यू झालेल्या आत्म्याला गती मिळते असा हिंदू धर्मात समज आहे.

साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावरम्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे"शेरी लिंब"नावाचे गाव आहे,
या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीरआहे.
शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर.
ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी.
साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.
अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत.
विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास चोरवाटा आहेत.
या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.
या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले.
या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० एक फूट आहे.
विहीर दोन टप्प्यात विभागली आहे.
अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर.
या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.
आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.
इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.
इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.
गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र.
खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.
या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्याछतावर चढून आलो आणि पाहिला तर इथेसिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे.
सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत.
इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाची कृपा आणखी दुसरं काय...!

आज चंपा षष्ठी
जय मल्हार

गड जेजुरी जेजुरी
तिथे नांदतो मल्हारी
स्वयं महादेव देव
मार्तंड भैरव अवतारी

गड जेजुरी जेजुरी
गडाला नवलाख पायरी
उधळण भंडा-याची
भक्त भक्ती भावे करी

गड जेजुरी जेजुरी
चमकते सुवर्णनगरी
जयाद्री सखी गौरीची
म्हाळसा बनली गौरी

गड जेजुरी जेजुरी
राजधानी मल्हारगडावरी
मणिमल्ल दैत्य माजले
रिपुदमन करी मल्हारी

प्राची देशपांडे

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
एका अबोल सांजवेळेत रमणारी
आयुष्यातले रंग मुक्त उधळीत
मनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवचित मला एकाकी गाठणारी
आवेगाच्या धुक्यात मला लपेटून
भुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
अवखळ अल्लड सरींनी सजणारी
सारा आसमंत भिजवून जाताना
पाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण

तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी
बंद मुठीतल्या चंचल वाळुपरी
लाख अडवून धरले तरी
निर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण

-एक एकटा एकटाच

तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे

बकुळिच्या पुष्पांपरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
अन्‌ रंगांनी भरले असते
क्षितिजावरले खिन्‍न रितेपण

पसरियली असती छायांनी
चरणतळी मृदुश्यामल मखमल
अन्‌ शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसून मिष्किल

तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धूसर अंतर

मंगेश पाडगावकर

भेट
वाटलं कधी भेटावसं
तर...
वाऱ्याची झुळूक होउन ये,
अलगद स्पर्शाने गोड
गालावरती चुंबन घे..!!
वाटलं कधी भेटावसं
तर...
पावसाची सर होउन ये
चिंब चिंब भिजवुनी
मिठितला आनंद दे..!!
वाटलं कधी भेटावसं
तर...
पाव्यातला सूर होउन ये
गोड गळयातील आवाजाने
हृदयाला तू साद दे...!!!
-मंजूळा हाडके

मराठी भाषेची सुंदरता👌

रंग पाण्याचे

'पाणी'शब्द हा असे प्रवाही
वळवू तिकडे वळतो हा
जशी भावना मनात असते
रूप बदलते कसे पहा

नयनामध्ये येते'पाणी'
अश्रू तयाला म्हणती
कधी सुखाचे,दुःखाचे कधी
अशी तयांची महती

चटकदार तो पदार्थ दिसता
तोंडाला या'पाणी'सुटते
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग 'पाणी' येते

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी
म्हणती अविरत 'पाणी'भरते
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी 'पाणी'जाते

वळणाचे 'पाणी' वळणावरती
म्हण मराठी एक असे
बारा गांवचे 'पाणी' प्याला
चतुराई यातूनी दिसे

लाथ मारूनी'पाणी'काढणे
लक्षण हे तर कर्तृत्वाचे
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो
'पाण्या'त पाहणे गुण खोटा
'पाणी'दार ते नेत्र सांगती
विद्वत्तेचा गुण मोठा

शिवरायांनी कितीक वेळा
शत्रूला त्या 'पाणी'पाजले
नामोहरम करून अपुले
मराठमोळे 'पाणी'दाविले

टपोर मोती दवबिंदूचे
चमचम 'पाणी'पानावरती
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे
अळवावरचे अलगद 'पाणी'

कळी कोवळी कुणी कुस्करी
काळजाचे'पाणी'होते
ओंजळीतूनी 'पाणी'सुटता
कन्यादान...पुण्य लाभते

मायबाप हे आम्हां घडविती
रक्ताचे ते 'पाणी'करूनी
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडते 'पाणी'
तुडुंब,दुथडी नद्या वाहती
दुष्काळाचे सावट पडतां
सारे'पाणी..पाणी'करती

अंतीम समयी मुखात 'पाणी'
वेळ जाणवे निघण्याची
पितरांना मग 'पाणी' देऊन
स्मृती जागते आप्तांची

मनामनांतील भावनांचे
'पाण्या'मध्ये मिसळा रंग
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा
चेहर्या‍वरती उठे तरंग

मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..
नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!
http://chinarsjoshi.blogspot.in/


पापणी आड दडलेले अश्रू
टचकन गालावर ओघळले
ह्रुदयीचे दुःख तुझ्या
काळजावर माझ्या वार करून गेले
वाटल तुला घ्याव जवळ
गालावरचे अश्रु ओठानी चुंबावे
पण अस तुझ रूप हे
वाटे , तुझ्याकडे पहातच रहावे
गुलाबी गुलाबी गालावर
अश्रु तुझे चमकले
शेवटी न रहावुन मी तुला
अलगद मिठीत घेतले
थरथरणारे तन तुझे
माझ्या मिठीत खुलले
तुझ्या ओठावरचे स्मितहास्य
नयनानी माझ्या क्षणात टिपले
सौ मनिषा पटवर्धन

।। गोष्ट छोटी, डोंगराएवढी ।।

त्या राजाला विश्वास असतो आपल्या प्रजेच्या प्रामाणिकपणावर. एकदा एक साधू राजाकडे येतो. राजा साधूला प्रजेच्या प्रामाणिकपणाविषयी सांगतो. ‘तेवढाच गुण आता दुर्मिळ होत चाललाय. तुझ्या प्रजेचं अभिनंदन ! पण मी तुझ्या प्रजेची एक छोटी परीक्षा घेऊ इच्छितो’, साधू बोलला. नगरात दवंडी पिटली. ‘राजवाड्याशेजारच्या हौदात प्रत्येक नागरिकाने एक लोटा दूध रात्री आणून टाकायचं.’ प्रत्येकजण हातात लोटा घेऊन हौदात दूध टाकून येत होता. हौदाकडे जाणारा कुणी एक असा विचार करत होता की, ‘इतक्या लोकांच्या दुधात आपले एक लोटा पाणी कोणाच्याच काय, देवाच्यासुद्धा लक्षात येणार नाही.’

सकाळी हौद उघडला. राजा हैराण झाला. हौदात फक्त पाणी होते. साधू महाराज अर्थपूर्ण हसले. नंतर राजा साधूसह राजवाड्यात निघाला. रस्त्यावर त्यांना एक गोड मुलगा हातात लोटा घेऊन हौदाकडे घाईघाईने जाताना दिसला. राजाने विचारल्यावर त्या मुलाने सांगितले, ‘झोपल्यामुळे रात्री हौदात माझे दूध टाकायचे राहून गेले. ते टाकायला जातोय.’ राजाने पाहिलं, तर खरंच त्या मुलाच्या लोट्यात दूध होतं.
‘मोठ्या लोकांना प्रामाणिकपणा ‘दाखवता’ येतो. काहींमध्ये तो असला तरी सर्वांत असेलच असं नाही. राजा, रात्री प्रत्येक माणूस लोटा झाकून नेत होता. रात्री तर अंधार होता ना? प्रामाणिक असणं या निरागस बाळासारखं उघड असतं. अशी मुलं आहेत, तोपर्यंत हे जग छान असेल. अशा मुलांना जप. त्यांच्यासाठी काही कर’, असं सांगून साधू निघून गेला.
गोष्टीतली ही मुलं खरी असतात का? परवा मी वरच्या गोष्टीतला मुलगा पाहिला. राज दत्तात्रय देसले असं त्याचं नाव. दुसरी-तिसरीत असावा. मी मनाने त्याला नमस्कार केला. तो कुणाला दिसणार नव्हता. निरपेक्ष कर्मयोगाची एक नाजूक कळी मला त्या मुलात दिसली. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, म्हणतात ना, अगदी असंच काहीतरी मी त्या बाळात पाहिलं. शाळा सुटली.

मुलं गलका करत घराच्या ओढीने शाळेच्या आवाराबाहेर पडत होती. त्यात हा राजही होता. पाठीला दप्तर, हातात पाण्याची बाटली. आमच्या शाळेच्या व्हरांड्यावरून मी ती मुलं पाहत होतो. राजने लक्ष वेधलं. त्याच्या हातातल्या बाटलीत बरंच पाणी उरलं होतं. वाकून तो ते पाणी सांडत होता. माझ्या शाळेतील पर्यावरणाचे शिक्षक मनोहर देसाई, मधू भांडारकर आम्ही जिज्ञासा म्हणून राजने जिथं वाकून पाणी टाकलं, तिथं पाहिलं, तर तिथे एक छोटं रोप लावलं होतं. त्या रोपाला राजने पाणी घातलं होतं. पाण्याचा सदुपयोग करणाऱ्या राजचं मला कौतुक वाटलं.

गोष्टीतल्या ‘त्या’ मुलाच्या आणि सत्यातल्या या ‘राज’सारख्या मुलांच्या माणूसपणाच्या रोपाला इथली कुटुंबव्यवस्था, शिक्षणव्यवस्था आणि समाजव्यवस्था आस्थेचं, प्रेमाचं आणि प्रेरणेचं पुरेसं पाणी घालू शकली तर या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरजच काय?

...कमलाकर देसले (मटा. ०५ मार्च २०१३)

मी माझी रे! उरले नाही

खोल कपारीमधील काळिज
कधी चोरले? कळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

विरहदाह मी शांत कराया
शीतल चांदण फुले माळली
स्वप्न बघू तर कसे बघू मी?
डोळ्यामध्ये प्रीत जागली
चंद्र भाळला! तुला सोडुनी
चित्त कुठेही रमले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

मेघ सावळा गेला भिजवुन
शहारलेले अंग मखमली
तरी पेटली यौवन काया
भाव मनी दाटले मलमली
बांध नको! मी नदी असोनी
अधी कधी खळखळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

स्वप्न रुपेरी नेत्री माझ्या
रंगवले अन् हरवलास तू
असे वाटते स्पंदनातुनी
माझ्यासंगे बहरलास तू
वादळातही निरव शांतता
पान एक सळसळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

काय हवे वेगळे याहुनी?
श्वास मिसळले तुझे नि माझे
मुक्त छंद क्षितिजावर गाऊ
विषय सुखाचे कशास ओझे?
चिरंजीव ही पहाट अपुली
इथे कधी मावळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

मी कधी कधी

मी कधी कधी
होतो खूप उदास
नसतो कधी जेव्हां
तुझा सहवास

मी कधी कधी
असतो खूप आनंदात
तू असलीस बरोबर की
साखर पडते दुधात

मी कधी कधी
होतो अस्वस्थ फार
उद्या संध्याकाळपर्यंत
तू नाही दिसणार

मी कधी कधी
विचारतो मनाला
अर्थ काय तुझ्याशिवाय
माझ्या जीवनाला ?

मी कधी कधी
होतो कासावीस
माझ्याशिवाय तू
रहात कशी असावीस ?

मी कधी कधी
ठेवतो मनाला सांगून
तू माझी झाली नाहीस
तर काय करू जगून

~अजित

बहीण: एक अनोखं नातं
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!
भाऊबीज च्या आपणा सर्वाना शुभेच्या

समृद्धी यावी सोनपावली,
उधळण व्हावी सौख्याची,
भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची,
इंद्रधनुष्याचे रंग खुलावे,
शुभेच्छा ही दिपावलीची.
सर्व नागरिकांना दिपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा

गारवा हवेतला
रसिक होऊ लागला
साजणा अशा क्षणी
तू हवा, तू हवा

नभ हलके उतरती
कानी हळूच कुजबुजती
हात हाती गुंफ़िण्या
तू हवा, तू हवा

झुळूक मंद हासली
प्रीत मनी बहरली
मुग्ध मिठी पांघरण्या
तू हवा, तू हवा

वारा बघ जुल्मी हा
छेडितो पुन्हा पुन्हा
स्वैर बटा आवरण्या
तू हवा, तू हवा

भुरभुरत्या पावसात
भिजले मी नखशिखान्त
पदर जरा सावरण्या
तू हवा, तू हवा

जयश्री अंबासकर

वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन ) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

आठवणी

जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं

या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण

आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या

ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले

आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात

~(आठवणीत हरवून गेलेला) अथांग सागर

तुझ्या गालावरच्या खळीने
मज वेड कसे लाविले
तुझ्या ओठावरच्या स्मित हास्याने
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या काळ्या कुंतल केसांनी
मज वेड कसे लाविले
तुझ्या भुरभुरणार्या बटांनी
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या झुळझुळीत गुलाबी साडीने
मज वेड कसे लाविले
वार्यासंगे फडफडणार्या पदराने
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या ठुमकत मुरडत चालीने
मज वेड कसे लाविले
तुझ्या थिरकत्या पैंजणानी
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या घायाळ करत्या नजरेने
मज वेड कसे लाविले
तुझ्या धुंद अशा मिठीने
तुझे प्रेम मजला सांगितले

सौ मनिषा पटवर्धन

जिथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला
हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला
आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते...

अशी सावळी आहेस

हृदयामध्ये ठसावी, अशी सावळी आहेस
रणरण शांत व्हावी, अशी सावळी आहेस

सावळ्या रंगांमधेही, कितीकिती तरी छटा
त्यातही उठून यावी, अशी सावळी आहेस

गोड सहज सोज्वळ, तुझ्या रंगाचाया बाज
जिथे थबकेल कवी, अशी सावळी आहेस

स्वप्नामधून पाहिली, किती तरी तरूणांनी
जीवनात तीच हवी, अशी सावळी आहेस

तुष्की एकटाच नाही, तुझ्या रंगावर फिदा
देव यक्ष आस लावी, अशी सावळी आहेस

~ तुष्की नागपुरी
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, ०७:५०

साडीचा "पदर" !
काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !
काना नाही, मात्रा नाही, वेलांटी
नाही, अनुस्वार नाही. एक
सरळ तीन अक्षरी शब्द. पण,
केवढं विश्‍व सामावलेलं आहे
त्यात!
किती अर्थ, किती महत्त्व...
काय आहे हा पदर?
साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या
खांद्यावर रुळणारा मीटर दीड
मीटर लांबीचा भाग. तो
स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच, सगळ्यात महत्त्वाचं
हे कामच त्याचं. पण, आणखी
ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा !
या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन्‌ कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.
सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते. सगळ्या जणींमध्ये
चर्चाही तीच.
लहान मूल आणि आईचा पदर,
हे अजब नातं आहे. मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन अमृत प्राशन
करण्याचा हक्क बजावतं.
जरा मोठं झालं, वरण-भात
खाऊ लागलं, की त्याचं
तोंड पुसायला आई पटकन
तिचा पदरच पुढं करते.
मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं
चालताना आईच्या पदराचाच
आधार लागतो. एवढंच काय,
जेवण झाल्यावर हात धुतला,
की टॉवेलऐवजी आईचा
पदरच शोधतं आणि आईलाही
या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात
मुलानं पदराला नाक जरी
पुसलं, तरी ती रागावत नाही
त्याला...
बाबा जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.
महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या
वरून मागे सोडला जातो;
तर गुजरात, मध्य प्रदेशात
उजव्या खांद्यावरून पुढं
मोराच्या पिसाऱ्यासारखा
फुलतो !
काही कुटुंबात मोठ्या
माणसांचा मान राखण्यासाठी
सुना पदरानं चेहरा झाकून
घेतात, तर काही जणी आपला
लटका, राग दर्शवण्यासाठी
मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !
सौभाग्यवतीची ओटी भरायची
ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं
वाण लुटायचं ते पदर लावूनच.
बाहेर जाताना उन्हाची दाहकता
थांबवण्यासाठी पदरच
डोक्‍यावर ओढला जातो,
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब
मिळते!
काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
पदरालाच गाठ बांधली जाते
अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची
गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबत
बांधली जाते.
पदर हा शब्द किती अर्थांनी
वापरला जातो ना?
नवी नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते, पण
कामाचा धबडगा दिसला,
की पदर खोचून कामाला
लागते.
देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या
चुका "पदरात घे.‘
मुलगी मोठी झाली, की आई
तिला साडी नेसायला शिकवते,
पदर सावरायला शिकवते अन्‌
काय म्हणते अगं, चालताना
तू पडलीस तरी चालेल.
पण, "पदर" पडू देऊ नकोस ! अशी आपली संस्कृती.
या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.
पदर सुटला म्हटले, की
फजिती झाली; कुणी पदर
ओढला म्हटलं, की छेड
काढली.
"पदरावरती जरतारीचा मोर
नाचरा हवा, आई मला नेसव
शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.
असा हा किमयागार साडीचा पदर आजकाल जिन्सच्या जमान्यात लुप्त होत चालला आहे . नाहीतर पुढील पिढीला त्याचा अर्थ सांगायला तुम्हाला आम्हाला नक्कीच डिक्शनरी काढावी लागणार हे देखील एक कटू सत्य आहे


(महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेल्या लेख मालेतील लेखांचे संकलन इथे पोस्ट करत आहे.)

ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात. नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो.

आदर्श नवरा दाखवा ,
हजार रुपये मिळवा

खरोखरच आपल्या बायकोच्या पसंतीला उतरणे हे बाहेर काढलेली टूथपेस्ट आत घालून दाखविण्याइतके कठीण काम. सदेह वैकुंठाला गेलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजसुद्धा एकदा वैतागून म्हणाले होते...

तीर्थ करूं जाता म्हणती कावळा, न करिता त्याला म्हणती बावळा

फार खाय त्याला म्हणती अघोरी, राक्षस हा असे खादाड भारी

थोडे खाय त्याची करिती टवाळी, अन्न कैसे पाप्याच्या कपाळी

तुका म्हणे किती राखावी मर्जी, संसाराचे त्रास घेता.

बायका नाट्य-समीक्षकांसारख्या असतात. विनोदी नाटक काढले , तर म्हणतात , ' अर्थहीनधांगडधिंगा. ' गंभीर नाटक काढले , तर म्हणतात , ' रिकाम्या नाट्यगृहातील अयशस्वीनिर्माता. ' ऐतिहासिक नाटक काढले , तरी टीका , सामाजिक नाटक काढले , तरी टिंगलीचासूर. म्हणून म्हणतात , ज्याला रस्ता माहीत असतो , पण ड्रायव्हिंग करता येत नाही ,त्याला टीकाकार म्हणतात.

नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो. रसिक नवरा प्रेमाने बायकोला म्हणतो , '' तुझा चेहरा कसा चंदासारखा सुंदर दिसतोय. '' तर लगेच ती म्हणते , '' काय हो हा तुमचा नेहमीचा टोमणे मारण्याचा त्रास! सरळ का नाही सांगत की , माझ्या चेहऱ्यावर डाग आहे म्हणून ?''
हनिमूनहून परतलेली स्मिता आईला सांगत होती , '' हा म्हणजे न अगदी येडचॅपच आहे. जाताना गाडीत अगदी वेगळा , घोगरा आवाज काढून माझा हात हातात घेऊन म्हणाला , 'स्मितू , अखेर आपण दोघे एकरूप झालो. ' अग , मला एवढी भूक लागली होती आणि हा अगदी बोअर करत होता. शेवटी मी त्याला सांगितले , ' जेवणाची ताटे दोघांची वेगवेगळी सांगा हं! ''

ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात.

एकदा माझा कार्यक्रम संपल्यावर एक बाई तावातावाने आत येऊन म्हणाल्या , '' अहो मेष राशीचे पुरुष तडफदार असतात , असे मी वाचले आहे. पण माझा नवरा तर अगदीचमेषपात्र आहे. ''
आणखी एक तक्रार त्रासदायक नवऱ्यांबद्दल बायका नेहमी करतात , '' आमचं हे येडं श्रावणबाळ आहे. बायको घरी आली , तरी आईचा पदर काही सोडत नाही. कोणत्याही वेळी आई अशी हाक मारतो. ''

एक नवरा तर जेवायला बसला की , पोळी हातात पकडून विमनस्कपणे सूक्ष्मात बघत गायचा , '' आई तुझी आठवण येते ''. शेवटी ती बाई एके दिवशी वैतागून म्हणाली , ''आईच्या हातच्या पोळ्या एवढ्या प्रिय असतील ना , तर जा आईकडेच हा कटोरा घेऊन. ''

हळवा नवरा बायकांना विलक्षण तापदायक वाटतो. लग्नानंतर काही महिन्यांतच कविताला दिवस गेले. मधून मधून उलट्या होऊ लागल्या आणि ती इतकी आनंदित झालेली असताना तिचा नवरा मात्र डोळ्यांत पाणी आणून म्हणाला , '' काऊ , किती ग त्रास होतोय तुला! खरंच ग , स्त्रीचा जन्मच कष्ट उपसण्यासाठी. '' आणि तिच्या मांडीवर झोपून हुंदके देत म्हणाला , '' देवा , देवा माझ्या काऊचे कष्ट मला दे. तिला सोडव. ''
माझ्या पतीपीडित भगिनींनो आणि मातांनो , काऊची अवस्था त्या वेळी किती केविलवाणी झाली असेल , याची कल्पना फक्त तुम्हालाच करता येईल.

नवऱ्याचा अतिसभ्य सुसंस्कृतपणाही बायकांना तापदायक ठरतो. मध्यमवय उलटून गेलेल्या वर्षाताई थोडे थट्टेने , थोडे वैफल्याने , थोडे वैतागून सांगत होत्या , '' माझे मिस्टर म्हणजे कातिर्कस्वामीच. आठवड्यातले चार दिवस उपास. पुन्हा एकादशी , संकष्टी वेगळीच. सोमवारी शिवलीलामृत , गुरुवारी गुरुलीलामृत , शनिवारी शनिमाहात्म्य. तास न् तास पारायणे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी थोडा एकान्त मिळाला म्हणून मी हळूच त्यांच्या छातीवर मस्तक टेकले , तर दूर होऊन म्हणाले , ' अगं , आज माझी एकादशी आहे. ' आम्ही हनिमूनला जायचे ठरवले , तर म्हणाले , ' आपण सोलापूरला जाऊ. तेथून गाणगापूर , तुळजापूर ,पंढरपूर सगळेच जवळजवळ आहे. ' प्रवासातही ते हनुमान चालिसा , शिवस्तुती , दासबोध वाचतच होते. हॉटेलवर पोहोचल्यावर हे लगेचच आंघोळीला गेले. मी चेंज करीत होते ,तेवढ्यात यांनी बाथरूमचे दार उघडले आणि ' सॉरी , सॉरी ' म्हणत पुन्हा बंद केले. नंतर आतूनच विचारले , ' झाले का ग तुझे ?''

तशी वर्षाताईंना तीन मुले आहेत , पण सांगताना त्या म्हणतात , '' मला चार मुले आहेत. हा सगळ्यांत मोठा.''

आळशी नवरेही बायकांना फार त्रासदायक वाटतात. बरेचसे नवरे रोज दाढी करत नाहीत. केली तर जमिनीवर आरसा ठेवून , मांडी घालून अर्धा-अर्धा तास दाढी करीत बसतात. साबणाचा फेस लावलेल्या भयानक चेहऱ्याने मध्येच पेपर वाचतात. मधूनच गाल खरडतात. तो साबणाचा फेस वाटीतच बुडवून ठेवतात. नंतर ती वाटी तशीच ठेवून सरळ आंघोळीला जातात.

सारख्या जांभया देणे , जांभया देत बोलणे , प्रचंड मोठी ढेकर देणे ,घोरनारे, सारखे आडवे होऊन झोपणे असे वागणारे नवरे काय भयंकर पीडाकारक असतात , ते समजण्यासाठी त्यांच्या बायकांच्या जन्मालाच जावे लागेल. कोणताही पीडाहारी झंडू बाम त्यांच्या डोकेदुखीला उपयोगी ठरत नाही.
एक नवरा सारखा झोपून राहायचा. त्याचा तापट मुलगा सारखा आरडाओरडा करायचा. एकदा त्याची झोपमोड झाली म्हणून तो रागावला , तर बायको म्हणाली , '' झोपलेल्या बैलापेक्षा भुंकणारा कुत्रा थोडा तरी कामाचा असतो. ''

नवऱ्यांचा , बायकी चौकशा करण्याचा स्वभाव तर बायकांचा रक्तदाब हमखास वाढवतो. एक इसम , बायकोच्या मैत्रिणी आल्या की , सरळ त्यांच्या कोंडाळ्यात जाऊन बसायचा. भयंकर नाजुक-नाजुक बोलायचा. एकदा बायकोच्या मैत्रिणीला म्हणाला , '' वहिनी , साडी नवी वाटतं?'' ती म्हणाली , '' छे हो , जुनीच आहे. '' परत तो म्हणतो , '' नाही , अंगावर कधी दिसली नाही , म्हणून विचारले हो सहज. '' तेव्हापासून ती बाई अंगभर पदर घेऊ लागली.

सारखी सिगरेट फुंकणारे किंवा तोंडात तंबाखू विरघळल्यामुळे लाळ सुटलेली असतानाही वर तोंड करून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करणारे नवरे बायकांना भयानक उपदवी वाटतात. काही नवरे येता-जाता आरशात बघून केस सारखे करतात , पावडर लावतात , वळून-वळून सगळ्या अँगल्सनी आरशात बघतात , हे तर बायकांना चीड आणते.

स्वयंपाकघरात मदत करतो असे सांगून काहीबाही तोंडात टाकत राहणारे नवरेही बायकांना असह्य वाटतात.
बायकोकडे सारखी मेहुणीची चौकशी करणे , सासूबद्दल विचारणा करणे , बायकोच्या मैत्रिणींच्या स्मार्टपणाचे कौतुक करणे , तिच्या वडिलांच्या इन्कमची चौकशी करणे , ' मीपण बिझिनेस करावा असे म्हणतोय ' असे नुसते म्हणत वर्षानुवषेर् पोस्टात नोकरी करीत राहाणे, अशा नवऱ्यांचा बायकांना फार संताप येतो.

कुठल्याही क्षणी लादेन येईल आणि बॉम्बस्फोट करेल अशा चेहऱ्याने वावरणारेही काही नवरे असतात. भयरसाचा अतिरेक झाल्यामुळे हास्यरस लोप पावलेला असतो. असे नवरे क्वचित हसले , तर त्यांच्या बायकांना बंपर लॉटरी लागल्यासारखे वाटते. हे सारखे काळजीत असतात. जरा दुखले , खुपले की , त्यांना भयंकर रोग झाल्याच्या भावना होऊ लागतात. बायको ' डॉक्टरांकडे जाऊ या ' म्हणाली , तर टेस्ट करून घ्यायलाही घाबरतात. अशा नवऱ्यांच्या बायकांना कायमची सदेह साडेसाती असते. असे नवरे बायकोचा कोणी अपमान केला , तरी तिचीच समजूत काढतात , '' जाऊ दे ग , तू लक्षच देऊ नकोस. ''

गुळगुळीत दाढी केलेल्या , गोल बायकी चेहऱ्याचे , काळ्याभोर डोळ्यांचे , हळुवार आवाजात गोड-गोड बोलणारे , नाजुक-नाजुक हसणारे , लाजरे-बुजरे पुरुष तर बायकांच्या डोक्यात जातात. काही पुरुष तर बहिरे असल्यासारखे दिसतात. पटकन प्रतिक्रिया देत नाहीत. बायको काही बोलली की , पेपरमधले डोकं वर काढतात , अतिशय निविर्कारपणे तिच्याकडे पाहातात, पुन्हा पेपरमध्ये डोके घालतात.

नवऱ्यांच्या जेवणाचे प्रकारही विचित्र असतात. काही नवरे भुरके मारतात की बोंब मारतात ,तेच तिला कळत नाही. मध्येच अ आ इ ई ची बाराखडी म्हटल्याप्रमाणे प्रदीर्घ ढेकर देतात. काही नुसते खातच राहतात. बायकोने सहज विचारले , '' खीर आवडली का हो ?'' तर भडकून म्हणतात , '' भुरके मारतोय , दिसत नाही का ?'' काही नवऱ्यांची बोलण्याची हिंमत नसते. भाजीत मीठ विसरलेले असले , तर मुलाला म्हणतात , '' अरे बंडू बाजारात मीठ महाग झाले आहे का ?'' काही संतापी नवरे पोळीचा तुकडा हातात धरून खेकसतात , '' ही पोळी आहे का चामड्याचा तुकडा ?'' आणि बायकांना संतापजनक वाटणारे नवरे म्हणजे अर्धा-अर्धा तास भात चिवडत बसून मिचिमिची जेवणारे आणि चप् चप् असा आवाज करणारे नवरे...

... बायकांना खूप-खूप आवडणाऱ्या एका तरी परिपूर्ण नवऱ्याची पत्रिका पाहाण्याचा योग माझ्या पत्रिकेत आहे का , याचा सध्या मी अभ्यास करीत आहे.

- शरद उपाध्ये

नवरात्र....

एक रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.

दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.

तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.

चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.

पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.

सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.

सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.

आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.

नवा रंग "स्त्री पुरुष समानता" हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा.

जगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचे सोने होईल!

 || सर्व मंगल मांगल्ये ,शिवे सर्वार्थ साधिके || शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||

नवरात्र महोत्सव मधील येणाऱ्या ९ दिवसात तुमचे सर्व मनोरथ,संकल्प पूर्ण व्हावेत तसेच नेहमी आरोग्य उत्तम राहून आपणास ऊदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना आई जगदंबेच्या चरणी करतो.

नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 
गप्पच राहवसं वाटतं
तुझ्याजवळ बसल्यावर
वाटतं तुच सगळं ओळखावस
मी गालात हसल्यावर....
-चंद्रशेखर गोखले

MarathiKavitaBlog

{facebook#https://www.facebook.com/marathikavitablog} {twitter#https://twitter.com/mkavitablog} {google-plus#https://plus.google.com/+MarathikavitablogBlogspot} {instagram#https://www.instagram.com/marathikavitablog/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget